रिफायनरी समर्थक थार चालक आंबेरकर पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी :- मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगातील थार गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पत्रकार शशिकांत शंकर वारीशे ( वय ४५ रा . कशेळी ) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले .
सोमवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला .या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते.
पत्रकार शशिकांत वारीशे दुचाकी ( क्रमांक एम . एच . ०८ एएस ०८७६ ) घेऊन राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपावर गेले होते . दुचाकीत पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून पंपाबाहेर येत असतानाच समोरून भरधाव वेगात आलेल्या थार गाडीने ( क्रमांक एमएच ०८ एएक्स ६१०० ) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली . या धडकेत वारीशे हे दुचाकीवरून खाली पडले तर त्यांची दुचाकी धार गाडीबरोबर फरफटत सुमारे २०० ते २५० फुट पुढे गेली .अपघातानंतर थार गाडी चालक गाडी टाकून पळाला होता . पोलिस त्याचा शोध घेत होते .या अपघात प्रकरणी थार गाडी चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक असून ते रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते.
मृत झालेल्या शशिकांत वारीशे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे. शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी संदर्भातील एका व्हॉट्सॲप गृपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. “मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीशे यांनी सोमवारी सकाळी गृपवर पोस्ट केले होते. त्यानंतर सोमवारी दुपारी हा अपघात झाला . हे अपघात प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शशिकांत वारीशे यांनी कशेळी गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी काम पाहिले होते .